न्यायालयात पुन्हा एकत्र आले आंदोलनाचे सहप्रवासी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मार्ग वेगळे, शेतकऱ्यांसाठीची लढाई एकच; साताऱ्यात भावनिक क्षण, आंदोलनाच्या आठवणींनी सातारा न्यायालय गहिवरले

कराड/प्रतिनिधी : –

कधीकाळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकसंध उभी राहिलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना कालांतराने वेगवेगळ्या गटांत विभागली गेली असली, तरी आंदोलनाच्या संघर्षातून तयार झालेले नाते आजही तुटलेले नाही, याची भावनिक प्रचिती सातारा न्यायालय परिसरात सोमवारी पाहायला मिळाली.

शंभराव्या गुन्ह्याची सुनावणी : २०१२ मधील ऊस आंदोलनासंदर्भात दाखल झालेल्या शेवटच्या शंभराव्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत सातारा न्यायालयात जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी संघटनेचे सचिन नलवडे यांना त्यांनी संपर्क साधून आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते पंजाबराव पाटील उपस्थित का नाहीत, अशी विचारणा केली. पाटील आजारी असल्याचे समजताच खोत यांनी आपला प्रवास थांबवून थेट टाळगाव गाठले.

टाळगाव : ज्येष्ठ शेतकरी नेते पंजाबराव पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करताना माजी मंत्री सदाभाऊ खोत. 

खोत व नलवडे झाले भावूक : पंजाबराव पाटील यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांची खालावलेली प्रकृती पाहून सदाभाऊ खोत व सचिन नलवडे भावूक झाले. अनेक वर्षांच्या आंदोलनातील आठवणींनी वातावरण भारावून गेले. पाटील यांनाही अश्रू अनावर झाले.

राजू शेट्टीही गहिवरले : त्यानंतर सदाभाऊ खोत व सचिन नलवडे यांनी त्यांना गाडीत बसवून सातारा येथील न्यायालयात आणले. न्यायालय परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते. पाटील यांची प्रकृती पाहून शेट्टीही गहिवरले.

भाऊंचा आत्मविश्वास व भूमिका प्रेरणादायी : याचवेळी आंदोलनाच्या काळातील एक दुर्मिळ छायाचित्र पंजाबराव पाटील यांनी सदाभाऊ खोत यांना भेट म्हणून दिले. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी अत्यंत भावनिक ठरला. गेल्या दोन वर्षांपासून पंजाबराव पाटील आजारी असून, बहुतांश वेळ घरातच असतात. मात्र आजही त्यांचा आत्मविश्वास आणि स्पष्ट भूमिका अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी आहे.

चळवळीला मोठा फटका : नुकत्याच सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांनी काही बाबींवर उघडपणे आपला निषेध नोंदवत आपली भूमिका ठामपणे मांडली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटल्यानंतर संघटनेतील मतभेद, आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणीमुळे चळवळीला मोठा फटका बसला. अनेक कार्यकर्ते व शेतकरी निराश झाले होते. मात्र आज न्यायालयात या तिन्ही नेत्यांना एकत्र पाहून अनेकांच्या मनातील दुरावा कमी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

वाटा वेगळ्या… ध्येय एकच : वाटा वेगळ्या असल्या तरी शेतकऱ्यांचे हित हेच अंतिम ध्येय असल्याची जाणीव या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आंदोलनाच्या या आठवणींनी सातारा न्यायालय गहिवरल्याचे दिसून आले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!