कराड/प्रतिनिधी : –
आ. मनोज घोरपडे यांनी शुक्रवारी ओगलेवाडी (ता. कराड) येथे घेतलेल्या जनता दरबाराला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये ५८३ नागरिकांनी आपापल्या विविध विभागातील समस्या आ. मनोज घोरपडे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या. यावेळी ३०० हून अधिक नागरिकांच्या समस्या आ. घोरपडे यांनी जागेवरच सोडवल्या.
मृत्युमुखी पर्यटकांना श्रद्धांजली : प्रारंभी, पेहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटक नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
२२ शासकीय विभागांचा सहभाग : यावेळी महसूल, भूमी अभिलेख, प्रांत विभाग, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, एमएससीबी, मदत व पुनर्वसन, पोलीस अधिकारी, ग्रामविकास, जलसंपदा, आरोग्य, एकात्मिक बालविकास, वनविभाग, शालेय शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, पशुसंवर्धन, फेरफार, अदालत व कोषागार विभाग यांसारख्या २२ शासकीय विभागातील समस्या सोडविण्यात यश आले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी आ. मनोज घोरपडे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे, कृषी अधिकारी, नायब तहसीलदार राठोड, उपनिबंधक यादव मॅडम यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
शिधापत्रिका व मंजुरीपत्र वाटप : याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप करण्यात आले. तसेच स्व. गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दोन लाख रुपये मंजुरीपत्र देण्यात आले. यावेळी बापूराव धोकटे, विजय कदम, नवनाथ पाटील, प्रकाश पवार, यशवंत डुबल, निलेश डुबल, संभाजी पिसाळ, विनायक भोसले, अमोल पवार, शिवाजी डुबल आदी उपस्थित होते.
चार मंडलातील हजारो नागरिकांची उपस्थिती
कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील चार मंडलातील विविध गावचे नागरिक व महिला आपापल्या समस्या घेऊन आ. मनोज घोरपडे यांच्या जनता दरबारात आले होते. यावेळी आ. घोरपडे यांनी जागेवरच अनेक प्रकरणांचा निपटारा केला. तसेच अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नागरिकांना न्याय देण्याच्या सूचना केल्या.