श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करावी – पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
कराड/प्रतिनिधी : –
जम्मू काश्मीरमध्ये कराड व सातारा येथील पर्यटक अडकल्या माहिती मिळताच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची थेट त्यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच याप्रश्नी थेट परराष्ट्र सचिवांना फोन करून जम्मू काश्मीरमधील पहलगाम, श्रीनगर येथे अडकलेल्या पर्यटक नागरिकांना सुखरूप मुंबईला पोहोचावाण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणीही केली आहे.
कराडचे पर्यटक अडकले : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ ते ३० पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे देशातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये कराड व साताराचे सुद्धा पर्यटक अडकले असून त्यामध्ये कराडच्या पाच पर्यटकांचा समावेश आहे.
महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क : कराडचे पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे पर्यटक महेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्याच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी अजूनही कराडचे पर्यटक मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती श्री. कुलकर्णी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. यावेळी पृथ्वीराज बाबांनी श्री. कुलकर्णी यांना आधार देत संयम ठेवण्याची विनंती केली.
कराडला सुरक्षित पोहचण्यासाठी प्रयत्न : तुम्हाला मदत नक्की मिळेल. तुम्ही लवकरात लवकर कराडला पोहचाल, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन पृथ्वीराजबाबांनी दिले.
पर्यटकांची यादी पाठवली : श्री. कुलकर्णी यांच्या सोबत बोलणे झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ परराष्ट्र सचिव व महाराष्ट्राच्या सचिवांशी संपर्क साधून कराडसह महाराष्ट्रातील सुद्धा पर्यटकांना लवकरात लवकर आणण्यासाठी सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी केली. प्रशासनाने जलद यंत्रणा कामाला लावावी, असे सांगून कराड व सातारामधील अडकलेल्या पर्यटकांची यादी सचिवांना पाठवली आहे.
दिल्लीत राहण्याची व्यवस्था : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महेश कुलकर्णी यांना संपर्क करून माहिती दिली. अगदी डायरेक्ट पुणे किंवा मुंबईपर्यंत जरी व्यवस्था नाही झाली, तरी दिल्लीपर्यंत तरी या. तुमच्या सर्वांची राहण्याची व्यवस्था दिल्लीत केली जाईल, असा आधारही पृथ्वीराजबाबांनी कराडच्या कुलकर्णी व क्षीरसागर कुटुंबियांना दिला आहे.
