कराड/प्रतिनिधी : –
पुनर्वशीत ३३ गावांचे पुनर्वसन होऊन २५-३० वर्ष उलटली, तरीही या गावांना नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. या संदर्भात नागरी सुविधांचा कृती आराखडा तयार करून प्राधान्यक्रमाने काम पूर्ण करणार असल्याचे आ. मनोज घोरपडे यांनी सांगितले.
आढावा बैठक : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पुनर्वसन झालेल्या ३३ गावांच्या सरपंच, उपसरपंच व गावातील प्रमुख मंडळींची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आ. मनोज घोरपडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्याधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी श्री गलांडे, पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांची उपस्थिती होती.
समस्या घेतल्या जाणून : या बैठकीत आ. घोरपडे यांनी बाधितांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून सदरच्या पुनर्वसनाबाबतचा आढावा घेतला.
महसूल विभागाकडे हस्तांतरण : बैठकीनंतर बोलताना आ. घोरपडे म्हणाले, तारळी, कण्हेर, धोम, उत्तरमांड व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आदींमुळे बाधित झालेल्या गावांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना सर्व सुविधा पुरवण्यात येतील. याचबरोबर काही गावांचे हस्तांतरण महसूल विभागात करण्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थिती : यावेळी अदिती भारद्वाज, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, धीरज जाधव, संदीप काटे, धोंडीबा कोळेकर, दादासो काटे, अजित केंजळे, पांडुरंग साळुंखे, रामदास बाबर, नितीन जाधव, बाबुराव चौधरी, दीपक संकपाळ आदी ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.