नागझरीचा ५० वर्षांचा पाणीप्रश्न मार्गी; ०.२६ टीएमसी पाणी आरक्षणामुळे दुष्काळ हटला
कराड/प्रतिनिधी : –
आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नातून नागझरी गावासाठी ०.२६ टीएमसी पाणी स्वतंत्रपणे आरक्षित करण्यात आल्याने गावाचा गेल्या पन्नास वर्षांचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल नागझरी ग्रामस्थांच्या वतीने आमदार मनोज घोरपडे यांचा सातारा येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी पेढे वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
संग्रामबापू व विक्रमनानांचाही सत्कार : याप्रसंगी युवा नेते संग्रामबापू घोरपडे व विक्रमनाना घोरपडे यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
१२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित : कराड उत्तर मतदारसंघात आ. मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून आतापर्यंत १२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागझरी गावासाठी स्वतंत्र पाणी आरक्षण मिळाले आहे. गेली अनेक दशके नागझरी गाव पाण्यासाठी संघर्ष करत होते. अनेकदा आंदोलने झाली, मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला; मात्र मागील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते.
पाणीप्रश्न विधानसभेत मांडला : आ. घोरपडे यांनी, निवडून आल्यानंतर नागपूर येथील पहिल्याच अधिवेशनात नागझरी गावचा पाणीप्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ०.२६ टीएमसी पाणी नागझरीसाठी स्वतंत्र आरक्षित करण्यात यश आले. यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी हा आनंदोत्सव उत्साहात साजरा केला.