भाग चौथा :
आजच्या लेखमालेचा प्रारंभ करण्यापूर्वी लेखाच्या शीर्षकात थोडा बदल करणार आहे. आता लेखाचे शीर्षक “श्रीशिवछत्रपतींची प्रेरणा व व्याघ्रगडाची दिव्यानुभूती!” असे करणार आहे.
लिहीणं गरजेचं असतं. जे ऐकायला तयार नाहीत, त्यांनी वाचाव म्हणून!
काही गोष्टींचा खुलासा आधीच केलेला बरे असते. नाही तर पुढे जाऊन अधिक गोंधळाची स्थिती उद्भवू शकते. नेमकी हीच बाब आम्ही दुर्लक्षित केली होती आणि आता त्याचे परिणाम भोगण्याची वेळ आमच्यावर आली होती. अर्थात अशा प्रसंगातून यापूर्वी देखील आम्ही तावूनसुलाखून निघालो होतो. म्हणजे मयूर गणेश मंडळाचा प्रारंभीचा काळ असेल किंवा महापुरात स्वतःला झोकून देण्याचा अतिशहाणपणा असो; केवळ “दैव बलवत्तर” म्हणूनच हे दिवस पाहण्याचे भाग्य लाभले आहे.
एक मात्र खरे की यापूर्वी ज्या प्रसंगातून आम्ही सुखरूप निभावलो होतो त्यापेक्षा आता येणारी परिस्थिती “ना भूतो ना भविष्यती” अशीच असणार होती.
बामणोली ते वासोट्याचा पायथा (जलाशयाचा काठ) इथपर्यंत तरी सर्व काही व्यवस्थित पार पडले होते. पण ज्यावेळी त्या नावाड्याने दूरवर पसरलेल्या आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या पर्वत शिखराकडे दिशा निर्देश केला त्याच वेळी आमच्या ‘आत्मविश्वासाला पहिला सुरुंग’ लागला होता. फक्त स्वतःच्या मनातील भावना कुणी व्यक्त करत नव्हते. पण आमच्या चेहऱ्यावर पसरलेली शांतता व भययुक्त रेषा सर्व काही सांगून जात होती.












