कराड/प्रतिनिधी : –
शेतकरी नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने उभारली असून त्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. अशा संघटनेत राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रवेश केला असून शेतकऱ्यांसाठी काहीतरी योगदान देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी युवकांच्या विविध प्रश्नांसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मत कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांनी व्यक्त केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमेदवारी : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून इंद्रजीत गुजर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना तिसऱ्या आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्यासह तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नोकरी, उद्योग व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्नशील : आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सांगत श्री. गुजर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. सर्वसामान्य लोकांच्याही अनेक समस्या आहेत. तसेच आपल्या भागातील युवकांना नोकरी, व्यवसायासाठी इतरत्र जावे लागते. मात्र, त्यांना याच ठिकाणी नोकरी मिळावी. उद्योग, व्यवसाय करता यावा. यासाठी आपण प्रयत्नशील असून कराड तालुक्यात उद्योग, व्यवसायाच्या, तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.