यशवंत कृषी प्रदर्शनामुळे शेतकरी समृध्द

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

खा. नितीन पाटील; यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –

कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन राज्यातील कृषी व तंत्रज्ञानाला दिशा देणारे ठरले आहे. या प्रदर्शनाची उदात्त हेतूने विलासराव पाटील – उंडाळकर यांनी पायाभरणी केली. त्यांचा आदर्श घेवून हे प्रदर्शन दिवसेंदिवस बहरत चालले आहे, असे सांगून या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवी संकल्पना राबवली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा व कृषी विकासाचा मूळ हेतू घेवून प्रदर्शन चालवण्याची परंपरा टिकावी व यातून शेतकरी समृध्द व्हावा, असे मत सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा खा. नितीन पाटील यांनी व्यक्त केले.

उद्घाटन : शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने भरविण्यात आलेल्या 19 व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी महात्मा फुले, (स्व.) यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कराड उत्तरचे नवनिर्वाचित आ. मनोज घोरपडे आहेत.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक विजयकुमार कदम, नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, संभाजी चव्हाण, सतीश इंगवले, सर्जेराव गुरव, जे. बी. लावंड, गणपत पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, दिनकर बोर्डे, सहाय्यक उपनिबंधक संजय जाधव, मनोहर शिंदे, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, फलटणच्या यशवंत सहकारी बँकेचे अध्यक्ष महेशकुमार जाधव, स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

विलासकाकांचे योगदान विसरता येत नाही : यशवंतराव चव्हाण व किसन वीर यांचा खरा आदर्श विलासराव पाटील यांनी जपल्याचे सांगत खा. नितीन पाटील म्हणाले, जिल्हा बँकेच्या विकासाची पायाभरणी जुन्या जाणत्या लोकांनी केली. यामध्ये विलासकाकांचे योगदान विसरता येत नाही. रयत कारखाना कर्जमुक्त झाला आहे. कराडची बाजार समिती जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. विलासकाका काकांच्या इतकी राजकारणातील उंची गाठावी, यासाठी अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांना सर्वांना हात द्यावा.

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार : राज्यातील प्रगत असलेली कराडची बाजार समिती विविध माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कार्यरत असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेतीला आधुनिकीकरणाकडे नेण्याचे स्वप्न विलासकाकांनी पूर्ण केले. भारतात उत्पादन वाढीची नितांत गरज आहे. त्याबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची तितकीच गरज आहे. शेतीतील उत्पादने, दूध, अंडी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कृषी उत्पन्नात मांस उत्पन्नही महत्वाचे आहे. यासाठी कृषी प्रदर्शन महत्वाचे आहे. सातारा जिल्ह्यात कायमस्वरुपी कृषी प्रदर्शन सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेने प्रयत्न करण्याची गरज आहे. अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून पक्षीय राजकारणाच्या बाहेर जावून केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जातो, हे खूप कौतुकास्पद आहे.

आधुनिक ज्ञानासाठी प्रदर्शन : विलासराव पाटील – उंडाळकर हे कायम टिकावू काम करत होते, असे सांगत श्रीनिवास पाटील म्हणाले, लोकांचे पोट भरण्यासाठी दिवसभर राबणारा शेतकरी राजाला नवीन काहीतरी बघता यावे, यासाठी विलासराव पाटील – उंडाळकर यांनी प्रदर्शन सुरू केले.

राज्यातील आदर्शवत प्रदर्शन : कराडला राज्यातील आदर्शवत प्रदर्शन भरत असल्याचे सांगत आ. मनोज घोरपडे म्हणाले, शेतीमध्ये नोकरी व व्यवसायाच्या संधी आहेत. प्रदर्शनातून प्रत्येकाला नवे ज्ञान मिळते. चांगल्या विचाराकडे तालुक्यातील संस्था असल्याने शेतकऱ्यांचे हक्क अबाधित आहेत.

क्रांती टिकवून ठेवण्याची किमया : शेतीमधील क्रांती याच जिल्ह्यात सुरू झाली आणि ती टिकवून ठेवण्याची किमया सातारा जिल्ह्याने केली केल्याचे सांगताना भाग्यश्री फरांदे म्हणाल्या, शेतकऱ्यांनी शेतीतील उत्पादने मूल्यवर्धित करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी तरुण वर्गाला उच्च शेतीचा मार्ग दाखवला पाहिजे.

समाजाभिमुख कामकाज : कराड बाजार समितीच्या विकासासाठी विलासकाकांनी कसोशीने प्रयत्न केल्याचे सांगत अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, या संस्थेचे कामकाज समाजाभिमुख व शेतकऱ्यांच्या हितासाठी ठेवण्याचा विलासकाकांनी दंडक घातला आहे. बाजार समितीचा धान्य बाजाराचा व्यापार लवकरच सुरू होईल.

काकांनी यशवंत विचार रुजवला : प्रास्ताविकात प्रकाश पाटील म्हणाले, विलासराव पाटील – उंडाळकर यांनी यशवंत विचार खऱ्या अर्थाने रुजवला. त्यांनी यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे आयोजन सुरू केले. उत्तरोत्तर प्रदर्शनाची प्रगती झाली आहे. यातून प्रेरणा घेवून राज्यात इतर ठिकाणी कृषी प्रदर्शने सुरू झाली. मुंबई पाठोपाठ कराड मार्केटचे दर तेजीत असतात. यामागे विलासकाकांचे अथक परिश्रम आहेत. 

स्वागत व आभार : प्रकाश पाटील, संभाजी काकडे, विजयकुमार कदम, नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, संभाजी चव्हाण, सतीश इंगवले, सर्जेराव गुरव, जे. बी. लावंड, गणपत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी काकडे यांनी आभार मानले.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!