कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाची घोषणा ही भागासाठी महत्त्वाची 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. डॉ. अतुल भोसले; अर्थसंकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती 

कराड/प्रतिनिधी : – 

राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले असून, कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाची घोषणा ही या भागासाठी महत्त्वाची ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केली.

रोजगारनिर्मितीला चालना : अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना आ. डॉ. भोसले यांनी सांगितले की, कराड येथील विमानतळाचा विस्तार झाल्यानंतर या भागाचा प्रमुख शहरांशी हवाई संपर्क वाढण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणूक, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. जलद वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेली लॉजिस्टिक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि नव्या उद्योगांसाठी कराड परिसर आकर्षणाचे केंद्र ठरेल. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळून कराडची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असे त्यांनी नमूद केले. या निर्णयाबद्दल आ. डॉ. भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले.

शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ : अर्थसंकल्पात शेतकरी व ग्रामीण विकासासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत थकीत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीक व्यवस्थापन व बाजारभाव मार्गदर्शन : शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक मूल्यसाखळी उभारण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. तसेच ‘महाविस्तार-एआय’सारख्या तंत्रज्ञानाधारित उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन आणि बाजारभाव याबाबत मार्गदर्शन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वासोटा किल्ला रोपवे : सातारा जिल्ह्यात पर्यटनविकासासाठीही महत्त्वाचे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. वासोटा किल्ला येथे प्रस्तावित रोपवे प्रकल्प, तसेच दरे येथे उभारण्यात येणारे निसर्ग केंद्र या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

शेती व उद्योग क्षेत्राला नवी दिशा : याशिवाय राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी स्वतंत्र केंद्रे, ग्रामीण रस्त्यांचा विकास आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व उद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्याचा सरकारचा स्पष्ट निर्धार या अर्थसंकल्पातून दिसून येत असल्याचेही आ. डॉ. भोसले यांनी सांगितले.

उद्योजक व मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा : एकूणच हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग दाखवणारा असून, शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण उद्योजक आणि मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा देणारा असल्याचे आ. डॉ. अतुल भोसले यांनी नमूद केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!