उंब्रजमध्ये १३३.४५ कोटींचा पारदर्शक उड्डाणपूल मंजूर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कराड/प्रतिनिधी : –

पुणे-कागल राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या उंब्रज (ता. कराड) येथे पारदर्शक उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल १३३.४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतचे पत्र माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना पाठवून मंजुरीची माहिती दिली आहे.

मागणी : उंब्रज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला असून, अपघातांचे प्रमाणही चिंताजनक झाले आहे. या पार्श्वभूमीवर उंब्रज येथे अनेक अंडरपाससह पारदर्शक उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे लावून धरली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या कामासाठी निधी मंजूर झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.

नागरिक व वाहनांची वर्दळ : उंब्रज हे सुमारे ३० ते ४० गावांसाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. सुमारे ४५ हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात विविध सरकारी कार्यालये, बँका, पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस, टेलिफोन एक्सचेंज, महावितरण कार्यालय, सिटी सर्व्हे, सब-रजिस्ट्रार कार्यालय, कृषी विभाग, धोम सिंचन कार्यालय, महाविद्यालये, शाळा व रुग्णालये आदी सुविधा आहेत. त्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते.

लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित केला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ शहराच्या मध्यातून जात असल्याने उंब्रज शहराचे दोन भाग पडतात. तसेच चिपळूण–पंढरपूर राज्य महामार्ग (१४३) देखील येथेच राष्ट्रीय महामार्गाला छेद देतो. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढून उंब्रज हे अपघातप्रवण ठिकाण बनले आहे. सध्या येथे असलेला एकमेव उड्डाणपूल व अंडरपास अपुरा ठरत असून, पावसाळ्यात अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित केला होता.

शहराच्या विकासाला नवी गती : तसेच उंब्रज ग्रामस्थांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय मंत्रालयाकडे वारंवार पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित विभागाने तांत्रिक सर्वेक्षण करून प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला होता. आता केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाल्याने उंब्रजमधील वाहतूक समस्येवर मोठा दिलासा मिळणार असून, शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी माहिती माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!