आमदार रवींद्र चव्हाण; मलकापूर येथे महिला मेळावा उत्साहात संपन्न
कराड/प्रतिनिधी : –
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे करत आहेत. एक आदर्श लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करू शकतो, हे त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते, असे गौरवोद्गार भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी काढले.
भव्य महिला मेळावा : मलकापूर येथे आमदार अतुलबाबा भोसले यांच्यातर्फे आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यास हजारो महिलांची उपस्थिती होती.

अतुलबाबांचे हात बळकट करा : अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आमदार अतुलबाबा भोसले यांनी महिला मेळावा घेत तब्बल दहा हजार महिलांना भांडी वाटप केले, ही कौतुकाचे बाब असल्याचे सांगत आमदार चव्हाण म्हणाले, येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सर्वांनी त्यांचे हात बळकट करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अहिल्यादेवींच्या कामाचे अवलोकन करण्यासाठी महिला मेळावा : अहिल्यादेवी होळकर यांनी सतराव्या शतकात महिलांना स्वायत्तता मिळावी, समान अधिकार मिळावेत, समाजातील त्यांचे स्थान उंचवावे, यासाठी काम केले. त्यांच्या समाजोपयोगी कामाचे अवलोकन करण्यासाठी आपण हा महिला मेळावा घेतला असल्याचे आमदार अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.

फडणवीस सरकार असेपर्यंत योजना बंद होणार नाही : लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्ती असल्याची टीका विरोधकांनी केली. मात्र, माता-भगिनींसाठी आधी निधी, त्यानंतर विकासकामांना हे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवून ही योजना सुरू ठेवली आहे, असे सांगत अतुलबाबा म्हणाले, जोपर्यंत फडणवीस सरकार आहे, तोपर्यंत ही योजना बंद पडणार नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवलेल्या विविध योजनांचा आढावा यांनी घेतला. तसेच निवडणुकीआधी आपण दहा हजार महिलांना भांडी वाटप केले. आज कोणतीही निवडणूक नसताना आणखी दहा हजार महिलांना भांडी वाटप होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
