आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा भाग म्हणून तातडीची पावले
कराड/प्रतिनिधी : –
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक कराड येथे दाखल झाले आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मागणीनंतर राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत हे पथक तैनात करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय : सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय केला असून मदत कार्याला गती देण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेतली जात आहे.
२५ जवानांचा समावेश : कराड येथे दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकात एकूण २५ जवानांचा समावेश असून त्यामध्ये दोन अधिकारीही आहेत. हे पथक जलद मदत कार्य, शोध व बचाव मोहिमा यासाठी विशेष प्रशिक्षित आहे. या पथकाच्या सोबत तीन बोटी आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक अन्य बचाव साहित्यही आहे.
प्रशासनाच्या वतीने पथकाचे स्वागत : बुधवारी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या पथकाचे स्वागत केले. मान्सून कालावधीत संभाव्य आपत्तींना वेळीच प्रतिसाद देण्यासाठी हे पथक उपयुक्त ठरणार आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नगरपालिका आणि एनडीआरएफचे यांचे संयुक्त प्रयत्न नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
