शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स लि; रयत युनिट या साखर कारखान्याने गळीत हंगाम 2025-26 मध्ये गाळपास आलेल्या ऊसासाठी प्रति मे.टन 3,500 इतके एकरकमी ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ही माहिती कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सीएफओ योगेश पाटील यांनी दिली.
प्रमुख उपस्थिती : यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील – उंडाळकर व युनिट हेड रविंद्र देशमुख प्रमुख उपस्थित होते.
परंपरा कायम : कारखान्याने चालू हंगामात आजअखेर तब्बल 1.54 लाख मे.टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तसेच 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत गाळपास झालेल्या सर्व ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्याची माहितीही देण्यात आली. अथणी – रयत शुगर्सने यंदाही ऊस बिल वेळेत वितरित करण्याची परंपरा कायम ठेवत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
आवाहन : शेतकऱ्यांना योग्य दर मिळाल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनास मोठा हातभार लागणार आहे. चालू गळीत हंगामात अधिकाधिक प्रमाणात ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याने सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.