स्वा. दादा उंडाळकर पुरस्कार डॉ. भरत वतवाणी यांना जाहीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अॅड. उदयसिंह पाटील; उंडाळेत मंगळवारी स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक मेळाव्यात वितरण

कराड/प्रतिनिधी : –

स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वतवाणी यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त अॅड. उदयसिंह पाटील, विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी दिली.

पत्रकार परिषद : उंडाळे (ता. कराड) येथील स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वा. दादा उंडाळकर यांच्या ५१ व्या स्मृतीदिनानिमित्त ४२ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा मंगळवार (दि. १८) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत (निवृत्त) यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या संयुक्तिक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच मंगळवार (दि. १८) रोजी दुपारी २ वाजता स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदीर, उंडाळे येथे पुरस्काराचे वितरण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. धनाजी काटकर उपस्थित होते. 

डॉ. भरत वतवाणी

डॉ. भरत वतवाणी यांचे कार्य : डॉ. भरत वतवाणी यांच्या कार्याची माहिती देताना प्रा. गणपतराव कणसे म्हणाले, श्री वतवाणी यांचे रस्त्याने फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या बाबतीत मोठे कार्य आहे. त्यांनी आजपर्यंत तब्बल सात हजार रुग्णांवर उपचारांती बरे करुन त्यांना त्यांच्या घरी पाठवले आहे. वतवाणी यांचा जन्म कोलकता येथील, तर त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले. १९८८ पासून त्यांनी मनोरुग्णांसाठी श्रध्दा पूनवर्सन केंद्र स्थापन केले. आज कर्जत येथे हे केंद्र सुरु असून येथे १२० मनोरुग्ण उपचार घेत आहेत. या कार्याची दखल घेवून सन २०१८ मध्ये फिलीफाईन सरकारने त्यांचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराने गौरव केला आहे.

समाजकार्याची दखल : डॉ. भरत वतवाणी यांचे समाजकार्य अखंडित सुरु असून या एकंदरीत योगदानाबद्धल श्री. वतवाणी यांचा यावर्षीचा स्वा. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देउन गौरव करण्यात येणार असल्याचे प्रा. कणसे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन व समाजप्रबोधन : माजी मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी वडील स्वा.से. दादा उंडाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय स्वातंत्र्य सैनिकांचे अधिवेशन व समाजप्रबोधन कार्यक्रम सुरु केले होते. १९७५ पासून ही परंपरा अखंड सुरु आहे. उंडाळकर यांच्या पश्चात स्मारक समितीने अॅड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पूढे सुरु ठेवली असल्याचे प्रा. कणसे यांनी सांगितले. 

आवाहन : सदर राष्ट्रीय कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, माजी सैनिक उपस्थित राहणार असून तालुक्यातील शेतकरी, माजी सैनिक, युवक, महिला यांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वा. दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने अॅड. उदयसिंह पाटील यांनी केले.

आतापर्यंतचे सन्मानार्थी मान्यवर

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने आतापर्यंत स्वा.से. माजी राजदूत एन. जी. गोरे, सुप्रसिद्ध कवी ना. धो. महानोर, स्वातंत्र्य सेनानी श्रीमती उषा मेहता, स्वा.से. गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती निर्मलाताई देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारीया, स्वा.से. व साहित्यिक जी. पी. प्रधान, प्रसिद्ध शास्त्रतज्ज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गरुड, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य पी. बी. पाटील, स्वा.सै. प्रभाकरराव कुंटे, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषीतज्ज्ञ डॉ. जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, प्रसिद्ध वकील अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. अभय बंग, जे. जे. रुग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने, नार्बाडचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, अर्थशास्त्रतज्ज्ञ निळकंठ रथ, लेखक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे, डॉ. प्रकाश आमटे, स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य, लेखक सुरेश द्वादशीवार, डॉ. विवेक सावंत, प‌द्मश्री डॉ. गणेश देवी, प‌द्मश्री प्रतापसिंह जाधव, अभिनेते मकरंद अनासपुरे, अशोक जैन यांचा समावेश आहे.  

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!