११ व १२ ऑगस्टला मसूर व आटकेत मराठा समाजाच्या प्रश्नांवर युवक, शेतकरी, महिला व समाजबांधवांशी साधणार थेट संवाद
कराड/प्रतिनिधी : –
मराठा समाजाच्या विविध प्रश्नांना थेट जाणून घेण्यासाठी आणि समाजबांधवांशी संवाद साधण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यांतर्गत कराड तालुक्यात दोन जाहीर संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑगस्ट रोजी मसूर येथे, तर १२ ऑगस्ट रोजी आटके येथे या बैठका होणार आहेत.
थेट संवाद : मराठा समाजातील युवक-युवती, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील विविध घटकांशी या बैठकीत मनोज जरांगे पाटील थेट संवाद साधणार आहेत. शिक्षण, रोजगार, आरक्षण, शासकीय दाखले मिळविताना येणाऱ्या अडचणी तसेच आरक्षणाच्या अनुषंगाने शासनस्तरावर निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा होणार आहे.
अडचणी व प्रलंबित प्रश्नांबाबत मार्गदर्शन : समाजातील नागरिकांच्या अडचणी व प्रलंबित प्रश्नांची प्रत्यक्ष माहिती घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यासोबतच संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनेही या संवाद बैठकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
आवाहन : कराड दक्षिण व कराड उत्तर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने या दोन्ही बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, तसेच आपले प्रश्न व अडचणी मांडण्यासाठी समाजातील बंधू-भगिनी, युवक-युवती, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.