आ. अतुल भोसले यांनी केली शेतीच्या नुकसानीची पाहणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

नारायणवाडी परिसरात महामार्गाच्या कामामुळे शेतात पाणी नुकसान

कराड/प्रतिनिधी : –

पाचवड फाट्यालगत नारायणवाडी परिसरात महामार्गाच्या कामामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. आ.डॉ. भोसले यांनी आज शासकीय अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन, शेतीच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

९० हेक्टर शेती पाण्याखाली : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड फाट्यालगतच्या नारायणवाडी (ता. कराड) परिसरात महामार्गाच्या कामामुळे तब्बल ९० हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. याठिकाणी गटरची उंची रस्त्यापेक्षा जास्त असल्याने पाणी साचून राहत असून, पिकांचे मोठे नुकसान होते. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही संबंधितांकडून योग्य ती दखल घेतली जात नव्हती.

आंदोलन व आत्मदहनाचा इशारा : या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्या नारायणवाडीतील शेतकऱ्यांनी १४ ऑगस्ट रोजी आंदोलन छेडण्याचा आणि आत्मदहनाचा इशारा देत कराडचे प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले होते.

शेतकऱ्यांची भेट : याबाबतची माहिती मिळताच कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने नारायणवाडीत जाऊन आज शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

उपाययोजना : या पाहणी दरम्यान गटरची उंची रस्त्यापेक्षा अधिक असल्याने पाणी निचरा होत नसल्याचे स्पष्ट झाले. यावर ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी आमदार डॉ. भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी व स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली. तसेच पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक कामासाठी केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. याचबरोबर प्रस्ताव मंजूर होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना म्हणून आजपासूनच आवश्यक मशिनरी उपलब्ध करून देण्याचे आदेशही महामार्ग प्राधिकरणाला दिले.

प्रांताधिकारी, तहसीलदारांनाही सूचना : अतिक्रमण किंवा स्थानिक समन्वयाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना आ.डॉ. भोसले यांनी केल्या. नारायणवाडी परिसरातील ग्रामस्थांना कुठल्याही परिस्थितीत अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी दिले.

प्रश्न निकाली लागण्याची खात्री : यावेळी बोलताना शेतकरी जालिंदर यादव म्हणाले, आ.डॉ. अतुल भोसले यांनी आम्हा शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी थेट आमच्या बांधावर भेट देऊन पाहणी केली आणि आमचे म्हणणे ऐकून घेऊन उपाययोजना करण्याबाबत त्यांनी तातडीने प्रशासनाला सूचना दिल्या. त्यांच्यामुळे आमचा प्रश्न येत्या ६ महिन्यात निकाली लागेल, याची आम्हाला खात्री वाटते.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, माजी सरपंच राजेंद्र देशमुख, रवी जाधव, दीपक देशमुख, शिरीष देशमुख, संदीप कदम, रणजीत देशमुख, नथु पाटील, कृष्णात यादव, विश्वजीत यादव यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!