अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर; शांतता कमिटी बैठक, बॅनरबाजीवर नियंत्रण आवश्यक, कठोर कारवाई करणार
कराड/प्रतिनिधी : –
कराडमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना येथील नागरिक डोक्यावर घेतात. अधिकाऱ्यांही येथे काम करण्यास वाव आहे. त्यामुळे प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सोबत घेऊन लोकाभिमुख उपक्रम राबवावेत. पुढील वेळी कराडकर नागरिकांमधूनच आम्हाला शांतता कमिटीच्या बैठकीची गरज नाही, असे म्हटले पाहिजे. एवढी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण झाल्यास कराडचा हा पॅटर्न राज्यभरात आदर्शीला जाईल. त्यादृष्टीने सर्वांनी पावले उचलावीत, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी केले.
शांतता कमिटी बैठक : येथील कराड अर्बंन बँकेच्या शताब्दी सभागृहात मंगळवारी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूर पालिकेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक दीपक वागवे, अमित बाबर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बॅनरबाजीस नियंत्रणात ठेवा : कराड शहर, तसेच परिसरात वाढत चाललेल्या बॅनरबाजीस नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने आता ठराविक जागा आणि कालावधी निश्चित करण्यात यावा, असे सांगत अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर म्हणाल्या, यातून शहराचे विद्रुपीकरण टाळण्यास मदत होईल. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
दक्षता घ्या : शिवराज्याभिषेक दिन आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बकरी ईदसाठी शहरातील कत्तलखान्यांनाही तात्पुरत्या स्वरूपात परवानगी द्यावी. तसेच कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावावी. यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी केले.
कायदेशीर कारवाई करू : कराड शहरातील कोणत्याही कत्तलखान्याला सध्या परवानगी देण्यात आलेली नसल्याचे सांगत पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर म्हणाले, अशा संस्थांनी नगरपालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत परवाना मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
लवकरच विशेष मोहीम : बॅनरबाजीविरोधात लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले.
सूचनांवर कार्यवाहीचे आश्वासन : यावेळी नागरिकांनीही काही सूचना मांडल्या. त्याची दखल घेत सदर सूचनांसंदर्भात उपाययोजना व कार्यवाही केले जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी आभार मानले.
