महेश जाधव यांचा सवाल; निवासराव थोरात यांच्या वक्तव्यावर पलटवार
कराड/प्रतिनिधी : –
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याविषयी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या १०० टक्के खोट्या आहेत. कोणाच्या सांगण्यावरून ते खोटे बोलत आहेत; हे न उलगडणारे कोडे आहे, असा पलटवार महेश जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे केला आहे.
अनेक बैठका मोडल्या : आमदार मनोजदादा घोरपडे यांची सुरुवातीपासून भूमिका ही सर्वांना सोबत घेऊन ‘सह्याद्रि’ची निवडणूक लढण्याची होती. असे सांगत श्री. जाधव म्हणाले, काही लोकांनाही निवडणूक दुरंगी होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे कितीतरी वेळा त्यांनी बैठकी मोडण्यात आल्या. वास्तविक, आमदार मनोजदादा घोरपडे केवळ एकाच बैठकीला हजर होते. त्याअगोदर अनेक बैठका मोडण्यात आल्या, त्या का मोडल्या? हे न कळण्याइतपत कराड उत्तरची जनता अडाणी नाही.
प्रस्ताव मान्य नसल्याने स्वतंत्र पॅनल : धैर्यशीलदादा कदम, रामकृष्ण वेताळ, भिमरावकाका पाटील व संपतराव माने यांच्यासाठी पाच – सहा जागा व निवास थोरात यांच्यासाठी तीन जागा अशा एकूण आठ – नऊ जागा देण्याचे आमदारांनी मान्य केले होते. तरीही हा प्रस्ताव काही लोकांना मान्य न झाल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनल टाकल्याचे महेशबाबा जाधव यांनी म्हटले आहे.
…यावरूनच उद्देश स्पष्ट होतो : निवडणूक जाहीर झाल्यापासून आपण वारंवार आमचे नेते आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याविषयी बोलत आहात, यावरूनच आपला उद्देश स्पष्ट होतो. असे सांगत महेशबाबा जाधव यांनी म्हटले आहे की, आपण नक्की कुणाला विरोधक मानून निवडणूक लढली? हे सगळ्यांना कळून चुकलेले आहे.
रहिमतपूरच्या सभेत स्टेजवर होतात! : आपण वारंवार आमदारांना विधानसभेला मदत केली, असं वक्तव्य करत आहात. मात्र, मी आपणाला आठवण करून देऊ इच्छितो की, रहिमतपूरच्या सभेमध्ये आपण माजी आमदारांच्या प्रचार सभेमध्ये स्टेजवर उपस्थित होता. आपल्यासाठी एवढा पुरावा भरपूर असल्याचे श्री. जाधव यांनी पुढे म्हटले आहे.
तुम्हाला तेवढेही मतदान झाले का? : सध्या जो आपण प्रकार चालवलेला आहे, तो पूर्ण चुकीचा असून ज्या २२२१ सभासदांचा तुम्ही उल्लेख करत आहात. तुम्हाला तेवढे सुद्धा मतदान झालेले नाही, हे विसरून चालणार नाही, अशी टीकाही श्री. जाधव यांनी केली आहे.
…त्यामुळे अर्ज बाद झाला : आपण म्हणता की, आपला अर्ज आमदार घोरपडे यांनी बाद केला. परंतु, मी आपणास एक प्रश्न विचारू इच्छितो, की जर आपण संस्थेचे देणे लागत नसता, तर आपला अर्ज बाद झाला असता का? कर्ज काढले तुम्ही? ते थकवले तुम्ही? त्यामुळे आपला अर्ज बाद झाला आणि त्याच्यावरती हरकत ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. जर आपण माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे विरोधक असता, तर आपल्या अर्जावर बाळासाहेब पाटील यांनी हरकत घेतली असती. ती का घेतली नाही? यावरून सर्व स्पष्ट होते, अशीही टिप्पणी श्री. जाधव यांनी केली आहे.
आम्हीही टीका करू : तेव्हा कुणाचे तरी ऐकून आमच्या नेत्यावर बोलाल; तर यापुढे आपल्यावरही बोलण्यास आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशाराही महेशबाबा जाधव यांनी सदर पत्रकाद्वारे दिला.
