प्रा. ईश्वर रायण्णवर; आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान, शूद्र विचारांनी देशाशी फितूर केली
कराड/प्रतिनिधी : –
समाज परिवर्तन घडवण्यासाठी अनेक थोर समाजसुधारकांनी समाज सुधारण्याची मोठी चळवळ उभा केली. त्याच चळवळीला भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. समाज शिक्षणाचा, त्याच्या परिवर्तनाचा ध्यास घेतला. संविधान निर्मितीतून सर्वांना समान अधिकार दिला. त्यामुळे बाबासाहेब कोणत्याही एका समाजाचे नेते नव्हे, राष्ट्रपुरुष नव्हे; तर ते राष्ट्रनिर्माता होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासू वक्ते प्रा. ईश्वर रायण्णवर यांनी केले.
व्याख्यान : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भवानी शाखा आणि लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्यावतीने सोमवार (दि. १४) रोजी सायंकाळी आयोजित “राष्ट्रनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान” या विषयावरील विशेष व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी रा.स्व. संघाचे कोल्हापूर विभाग कार्यवाह व लोककल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विजय ह. जोशी व कराड शहर कार्यवाह महंतेश तुळजणवर प्रमुख उपस्थित होते.
बाबासाहेबांनी हलाहल पचविले : तत्कालीन परिस्थितीत रंजल्या, गांजलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप खस्ता खाल्ल्याचे सांगत प्रा. रायण्णवर म्हणाले, हलाहल पचवलेल्या शिवशंकराप्रमाणे बाबासाहेबांनी अनेक अपमान, अन्याय, अत्याचारांचे विष पचविले आहे.












