कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कराडकरांचा स्वाभिमान जपण्यासाठी परिवर्तनाची लाट उसळली आहे. या लाटेवर स्वार होऊन परिवर्तनाचे शिल्पकार होऊया, असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केले.
कोपरा सभा : करवडी (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या कोपरा सभेमध्ये ते बोलत होते.
उपस्थित मान्यवर : यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे उमेदवार दिनकर पिसाळ, बापू डुबल, शंकर पिसाळ, अशोक पिसाळ, भिकू माळी, संपतराव पिसाळ, जयसिंग डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पॅनलची प्रचारात आघाडी : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रंगात आली असून प्रचार शिगेला पोहोचला असल्याचे सांगताना श्री. वेताळ म्हणाले, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली स्व.यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलने प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.
सभासदांचा प्रतिसाद : या निवडणुकीत दिवसागणिक आपल्या पॅनलला मिळणारा सभासदांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणारी ही निवडणूक रंगतदार अवस्थेला पोहोचली असल्याचे श्री. वेताळ यांनी सांगितले.
झंजावाती दौरा : या निवडणुकीच्या प्रचारात रामकृष्ण वेताळ यांनी कोपर्डे हवेली, ओगलेवाडी, करवडी, वडोली निळेश्वर या परिसराचा झंजावाती दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी वाघेरी, वडोली निळेश्वर, करवडी हजारमाची या गावातील सभासदांना सभासद परिवर्तन पॅनलचे विचार पटवून दिले. या सभेला सभासदांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
सभासद कामगारांना देशोधडीला लावले : सह्याद्रि कारखान्याच्या प्रशासनाने मागील अनेक वर्षांपासून मनमानी कारभार करून सभासद, कामगार आणि शेतकरी यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे, असे सांगताना श्री. वेताळ म्हणाले, दुसऱ्या बाजूला ज्यांना स्वतःच्या कारखान्यात दरवाढ देता आली नाही, असे नेते कराडचा स्वाभिमान डीवचण्यासाठी धडपडत आहेत. या लोकांची चाल ओळखून यांना बाजूला ठेवूया.
परिवर्तनात सहभागी होऊया : सह्याद्रि’मध्ये पाच तारखेला परिवर्तन घडणार आहे. या परिवर्तनामध्ये आपण सहभागी होऊया, असे आव्हानही श्री. वेताळ यांनी केले.
सभासदांनी दिले आश्वासन : यावेळी उमेदवार दिनकर पिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कोपरासभेला करवडी गावातील सभासदांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावेळी परिवर्तन होणारच आणि कराडकरांचा स्वाभिमान ही जपला जाणारच यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू असेही सर्व सभासदांनी आश्वासन दिले आहे.
सह्याद्रिचं वारं बदलत चाललयं : या कोपरा सभेला परिसरातील अनेक सभासद बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याने वारं बदलत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.