आज १७ मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रतिनिधी आणि कराडकरांच्या हृदयात ‘बाबा’ म्हणून विराजमान असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा आदरपूर्वक आढावा घेताना ऊर भरून येतो.
प्रामाणिक तंत्रज्ञ, दूरदर्शी नेते : पृथ्वीराज बाबा हे केवळ एक राजकारणी नाहीत; ते एक प्रामाणिक तंत्रज्ञ, दूरदर्शी नेते आणि चव्हाण कुटुंबाच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहेत. मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत कराडला झुकते माप दिले, पण त्याच वेळी राज्यातील इतर जिल्हे वा तालुक्यांवर अन्याय होऊ नये याचीही काळजी घेतली. हा संतुलित दृष्टिकोन हाच त्यांच्या नेतृत्वाचा गाभा आहे.
शिक्षण आणि तांत्रिक प्रावीण्य : कराड नगरपालिकेच्या मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या पृथ्वीराज बाबांनी भारतातील प्रतिष्ठित बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी संस्थेतून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांना जर्मनीतून युनेस्कोची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे गेले आणि तेथून मास्टर ऑफ सायन्स पदवी संपादन केली.
देशासाठी योगदान देण्याची जिद्द : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरकारी नोकरीत रमण्याची इच्छा नव्हती. तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योग-व्यवसाय सुरू करून देशासाठी योगदान द्यावे, अशी त्यांची जिद्द होती. आई-वडिलांनी राजकारणातील काटेरी खुर्चीचा अनुभव घेतल्यामुळे राजकारणापासून दूर राहण्याची त्यांची इच्छा होती.
राजीव गांधींसोबतचे स्नेहसंबंध : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हे बाबांचे लहानपणापासूनचे सवंगडी होते. बाबांच्या आई आणि इंदिरा गांधी यांचे सख्य सर्वश्रुत आहे. शालेय सुट्टीच्या काळात दिल्लीत दोघांची ओळख झाली. दोघांचीही दिशा स्पष्ट होती, राजकारणात जायचे नाही. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. राजीव गांधी अपघाताने राजकारणात आले आणि त्यानंतर बाबांच्या आयुष्यालाही वेगळी दिशा मिळाली.
अमेरिकेतील तांत्रिक कारकीर्द : राजकारणात येण्यापूर्वी पृथ्वीराज बाबांनी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली परिसरात काम केले. Palo Alto येथे त्यांनी एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये काम करताना पाणबुडी-विरोधी युद्धप्रणालीसाठी व्हिडिओ रेकॉर्डर विकसित केला. अमेरिकेत भरपूर संधी असतानाही आपल्या ज्ञानाचा फायदा मायदेशाला व्हावा म्हणून ते भारतात परतले.
संगणक क्षेत्रातील योगदान : भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी ‘अप्लाईड इलेक्ट्रो मॅग्नेटिक्स’ ही कंपनी स्थापन केली. याच काळात राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती घडवली. संगणकात प्रादेशिक भाषा वापरता याव्यात या दृष्टीकोनातून पृथ्वीराज बाबांच्या टीमने एक सर्किट विकसित केले. आज भारतात संगणकावर मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगूसह सर्व प्रादेशिक भाषा वापरल्या जातात; त्याचे जनकांपैकी एक पृथ्वीराज चव्हाण मानले जातात. ही उपलब्धी केवळ तंत्रज्ञानाची नाही, तर भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेची आहे.













