पृथ्वीराज चव्हाण; माजी सहकारमंत्र्यांना ‘हाता’ची ॲलर्जी?, निवडून येण्यासाठीचा घोडेबाजार थांबवा
कराड/प्रतिनिधी –
कराड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी खुले आरक्षण आहे. या ठिकाणी काँग्रेसची ताकद कमी असली तरी, हाताच्या चिन्हावर लढायची आमची तयारी होती. मात्र नगराध्यक्ष पदासाठीच्या मराठा समाजातील उमेदवारांवर प्रचंड दबाव आणला गेला. त्यामुळे ऐनवेळी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने निवडणूक लढायची तयारी दर्शवल्याने उमेदवारी दिल्याचे सांगत काँग्रेसने मराठा समाजावर कोणताही अन्याय केला नसल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
जाहीर सभा : येथील विठ्ठल चौकात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री रमेश बागवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते अजितराव पाटील – चिखलीकर, भानुदास माळी, शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव, इंद्रजीत चव्हाण, नामदेवराव पाटील आदी मान्यवरांसह नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण आणि नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
सहमती आणि पाठिंबाही दिला : श्री. चव्हाण म्हणाले, या निवडणुकीत एक भक्कम आघाडी करण्यासाठी संमती दिली, नगराध्यक्षपदासाठीही पाठिंबा दिला होता. परंतु आमचे लोक स्वाभिमानाने हाताच्या चिन्हावरचं उभे राहतील, ही भूमिका ठामपणे मांडली, मात्र त्यास विरोध झाला. माजी सहकारमंत्र्यांना ‘हाता’ची ॲलर्जी काय आहे, माहिती नाही. परंतु निवडणुकीत एक राष्ट्रीय पक्ष म्हणून हाताच्या चिन्हावर उभे राहणार नसाल; तर मी माघार घेतो, असे सांगितल्यावर पक्षाचे लोक चिन्हावर लढायला तयार झाले. आमची ताकद कमी असल्याने चार – सहा जागांवरही आम्ही समाधान मानणार होतो. मात्र माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हाताच्या चिन्हाला विरोध केला. त्यामुळे नगरसेवक पदासह पंधरा जागांवर काँग्रेसचे उमेदवार उभे केल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वधर्म समभावाची भूमिका : काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी झाकीर पठाण यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आपल्या समाजातील एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा मोठा होईल, या असुयेपोटी मुस्लिम समाजबांधवांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत श्री. चव्हाण म्हणाले, काँग्रेसने आंबेडकरांचे संविधान आणि सर्वधर्म समभाव ही भूमिका घेतल्याने देशात स्वातंत्र्यानंतर कुठलीही हुकूमशाही चालली नाही. मात्र आज जातीयवादी भूमिकेमुळे विचारधारेची लढाई लढण्याची वेळ आली आहे.
संविधान वाचवण्याचे काम : महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, यशवंतराव चव्हाण याचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यामुळे कराड पालिका निवडणुकीत क्रांती झाली तर, संविधान वाचवण्याचे काम आपल्याकडून होईल. अन्यथा सर्वसामान्य जनतेला कोणीही वाली राहणार नाही.
बी टीम असल्याचा प्रोपोगंडा : काँग्रेसचे उमेदवार ही भाजपची बी टीम असल्याचा प्रोपोगंडा पसरवला जात आहे. मताला मोठा दर काढला आहे, हे लोकांचे लुटलेलेच पैसे आहेत. महाराष्ट्रात याआधी एवढे भ्रष्ट सरकार कधी आले नव्हते, अशी टिपण्णी करत कराड नगरपालिका निवडणुकीत आमचे उमेदवार हाताच्या चिन्हावर उभे आहेत; ईव्हीएमवर नाहीत, असा टोलाही त्यांनी भाजप सरकारला लगावला. तसेच कराडला कॉन्ट्रॅक्टरच्या विळख्यातून सोडवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून क्रांती घडवा, असे आवाहन त्यांनी केले.











