आनंदराव पाटील; प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी मान्यवरांसह केले अभिवादन
कराड/प्रतिनिधी : –
कोयना-कृष्णेच्या पवित्र संगमभूमीत उभं राहून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रासह देशाचे नेतृत्व केले. सुसंस्कृत, प्रगत आणि सर्वसमावेशक महाराष्ट्राची घडण त्यांच्यामुळे झाली. अशा महान नेत्याच्या भूमीत राहण्याचा आम्हाला अभिमान आहे. सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून लोकहिताची भूमिका त्यांनी आयुष्यभर अंगीकारली. त्यांच्या पुरोगामी विचारांचे संवर्धन करणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे, असे मत माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी यांनी व्यक्त केले.
अभिवादन : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि राज्यघडणीचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त येथील प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी माजी आमदार आनंदराव पाटील यांनी शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी ॲड. ए. वाय. पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, हणमंतराव कराळे, वेणूताई इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी-शिक्षक, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.